आदरणीय सौ वैशाली ताईंच्या मनोगतातून पारायण व वाचन ह्यातील फरक स्पष्ट होतो. वाचनांत मनन असेलच असे नसते – उदा. आपण रोज पेपर वाचतो व बाजूला ठेवल्यावर क्षणांत विसरुन जातो. परंतु पारायणांत खूप कांही सामावलेले आहे – उदा. श्रध्दा, भक्ति, भाव, चिंतन, मनन, मार्गदर्शन, प्रेरणा, आश्वासन, आपल्या पाठीशी वैश्विक शक्ती उभी आहे ह्या भावनेतून पोरकेपण निघून जाणे त्यातून आत्मविश्वास उभा राहून जीवनांचे ध्येय, उद्दिष्ट गवसणे व नैतिकतेच्या पायावर जीवन विकास साधून नर अपनी करनी करे तो नर का नारायण हो जाए। ईश्वराप्रत जाण्याचा प्रवास प्रगतीपथावर नेणे अशा अनेकविध बाबी पारायणांतून लाभतांत. साहित्याच्या क्षेत्रातील नामवंत पण एकेकाळी नास्तिक असलेल्या व्यक्तिद्वारे तरुण पिढीला बुआबाजी व संत-संतकार्य ह्या विषयीचा संभ्रम दूर होऊन योग्य मार्गदर्शन मिळावे अशा ईश्वरी प्रेरणेतूनच सौ. ताईंच्या हातून हे बुध्दिनिष्ठ चिंतनपर विचार पुष्पांची माळ श्री सद्गुरुंचे – श्री गजानन महाराजांचे पायी अर्पण होत आहे असा विश्वास सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल ह्यांत शंका नाही.
सौ. वैशाली ताईंनी अत्यंत सुलभ व सोप्या भाषेत प्रत्येक अध्यायातील महारांजांची कृती, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर महाराजांचा प्रभाव, चालीरीती, रूढींविषयी महाराजांची बुध्दिनिष्ठ शिकवण ह्यांचा सूक्ष्म विचार करुन विवेचन केलेले आहे.
वेद, उपनिषदे, पुराणे, महाकाव्य, सुभाषिते,श्लोक, अवतार व संतांची चरित्रे इत्यादीं वाचण्याची मधील शब्दार्थ व गूढार्थ हा फरक लक्षांत घेणे, त्याविषयी औत्सुक्य निर्माण होणे व संतकृपेने त्याची उकल होऊन मतिप्रकाश होणे ह्या साठी पारायण-चिंतन-मनन-जप-ध्यान-अनुकरण करण्याची बुध्दि-प्रवृत्ती होणे ह्याला ईश्वरी कृपा म्हणता येईल. पापक्षये रघुनाथ सेवा- ही उक्ती समजणे गरजेचे आहे. सौ. वैशाली ताईंनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने सुलभ शब्दांत व प्रभावीपणे आपल्या लेखनाद्वारे पोहोचविण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.
आदरणीय सौ. वैशालीताई पंडित व सह्रृद श्री बिपिन जी बाकळे यांचे स्नेहकृपेने मला हे अध्ययन व विवेचन करण्याच्या रुपाने श्री महाराजांचे स्तवन, स्मरण करण्याचे भाग्य लाभले. त्यांचा मी सदैव ऋणी आहे. ही सुध्दा महाराजांची कृपा. जे जे आपणांस योग्य वाटेल, रुचेल ते ते महारांजांचे देणे व त्यांची प्रेरणा व ज्या ज्या चुका किंवा चुकीचे अर्थ मी केले असतील ते ते माझे अज्ञान असून आपण मला अजाण बालक समजून उदार अंतःकरणाने क्षमा करावी ही विनम्र प्रार्थना.
जय जय गण गणांत बोते — संत सद्गुरु श्री गजानन महाराजकी जय.