१९५० ते १९८० हा हिंदी सिनेसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. या दरम्यान मदनमोहन, सलील चौधरी, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, जयदेव, एस डी बर्मन, आर् डी बर्मन, रोशन असे दिग्गज संगीतकार बहरात होते. त्यांच्या उत्तमोत्तम कलाकृतींनी रसिकांवर जादू केली होती जी अजूनही कायम आहे. पण काही वेळा ही गाणी कालौघात मागे पडतात, विस्मृतीत जातात. अशाच काही अजरामर कलाकृतींना पुन्हा रसिकांसमोर आणून त्यांना उजाळा देण्याचा “गानगोष्टी” या सदरातून मी प्रयत्न केला. दिव्य मराठी या वर्तमानपत्राने ‘मधुरिमा’ या पुरवणीत या सदराचा अंतर्भाव करून छापायला सुरुवात केली. सहज म्हणून सुरू केलेल्या या लिखाणाने मलाही व्यक्तिशः खूप आनंद दिला. दर पंधरा दिवसांनी सदर प्रकाशित व्हायचे. वर्षभर चाललेल्या या सदरातील गाण्यांची निवड करताना खूप निकष लावावे लागले. गाणी शक्यतो सगळ्यांच्या माहितीतली असावीत, नुसतीच श्रवणीय नव्हे तर प्रेक्षणीय पण असावीत हा विचार करावा लागला, कारण ही सगळी चित्रपटगीते आहेत आणि चित्रपट हे दृक्श्राव्य माध्यम आहे. त्यामुळे यात दृश्यांचा मोठा वाटा आहे. तसेच ज्या चित्रपटांतील ही गाणी आहेत ते चित्रपटही दर्जेदार असावेत हे बघितले. त्यामुळे नियमितपणे गाणी ऐकणे, बघणे, गीतकार-संगीतकार यांची भूमिका समजावून घेणे, गाण्याचे शब्द, सूर, चालीतील बारकावे जाणून घेणे, गाणं ज्यांच्यावर चित्रित झालं आहे त्या कलाकारांच्या शैलीचा अभ्यास करणे, त्यासाठी ते चित्रपट नव्याने बघणे असा हा दीर्घ प्रवास होता आणि तो करताना मला खूप आनंद मिळाला. पूर्वी पाहिलेल्या अनेक गोष्टी नव्याने समजल्या, अनेक गाण्यांचे आणि चित्रपटांचे अर्थ पहिल्यांदाच खूप खोलवर जाणवले. एक रसिक म्हणून ही नक्कीच प्रगती होत होती, नाही का !!